हरगुडेतील धक्कादायक प्रकार! घर बांधकाम साहित्याची सर्रास चोरी; पोलिस झोपेत? तक्रारही घेत नाहीत — मग न्याय कोण देणार ?

 

लोकजागृती विशेष : पुणे जिल्ह्यातील मौजे हरगुडे (ता. पुरंदर) येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. घर बांधण्यासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले, तरीही पोलिस प्रशासनाने अद्याप साधी तक्रारही नोंदवून घेतलेली नाही, असा संतापजनक आरोप समोर आला आहे.

पीडित दीपक महादेव शिळीमकर यांनी गट क्रमांक 499 मध्ये स्वतःचे घर बांधकाम सुरू केले होते. सिमेंट, वाळू, लोखंडी रॉडसह सर्व आवश्यक साहित्य त्यांनी जागेवर साठवून ठेवले होते. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधारात हे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, या प्रकरणात संशयित म्हणून “मामांची मुले” असल्याचे स्पष्टपणे सांगूनही पोलिसांकडून कोणतीही तत्पर कारवाई झालेली नाही. उलट, तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.

पीडिताचा थेट सवाल :

“माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस जर तक्रारच घेत नसतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा?”

स्थानिकांमध्ये संताप 

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “चोरी झाली तरी गुन्हा दाखल होत नसेल, तर गुन्हेगारांना मोकळे रान मिळणार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मोठा प्रश्न उभा :

पोलिस प्रशासन नेमकं कोणाचं संरक्षण करत आहे?
तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ का?
संशयित मोकाट फिरत असताना कारवाई का होत नाही?
📢 न्यायासाठी मागणी :
पीडित दीपक शिळीमकर यांनी तात्काळ FIR नोंदवून, निष्पक्ष तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, हा विषय उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आणि न्यायालयापर्यंत नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकजागृतीचा इशारा :
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर हा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून उचलला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *